Wednesday 1 April 2015

नवीन वर्ष २०१५- एक नव्या दिशेचा शोध


लेखक- सुधीर खोत.
फोन नं.९८५०८४०९५३

प्रत्येक वर्ष कसं पुस्तकासारखच असत ना ! ३६५ दिवसाचं!!
जसं नवं पान उलटू तसं नवं मिळत जातं, नवं पान, नवा दिवस, नवी स्वप्ने, नवी ध्येय, नव्या  आशा, नव्या दिशा, नवं यश, नवं हर्ष, नवं वर्ष सगळ कसं नवं नवं.
या सर्व नविन गोष्टी मध्ये आपली पैश्याबद्दलची मानसिकता मात्र एकदम जुनीच राहते. याच जळमटाने व्यापलेली आपली पैश्याबद्दलची मानसिकताच आपल्याला आपण आज जिथे आहोत तिथेच वर्षानुवर्ष ठेवते.
नविन वर्षात जर आपल्याला आपली पैश्याची परिस्थिती सुधारावी अशी आपण अपेक्षा ठेवत असू, तर आपण आपल्या पैश्याबद्दल कसा विचार करतो यावर विचार करणे अपेक्षित आहे. आता हे थोडंस अवघडच वाटत असेल ना. चला तर मग थोड सोप्प करून पाहू.
असे कोणीतरी म्हटले आहे की, “जर आपल्याला आजपर्यन्त मिळालेल्या पैश्याच्या यशापेक्षा चांगले यश हवे असेल तर; आज पर्यंत आपण जे करत आलो आहोत त्यापेक्षा वेगळे काहीतरी करावे लागेल,” आता हे म्हणजे नेमक काय. बरं, एक उदाहरण पाहू. जर एका आंब्याच्या झाडाला चांगली फळे येत नसतील तर आपण फळाला दोष देतो का? नाही ना. जर आपण त्या निर्माण झालेल्या फळांवर बाहेरुन फवारणी केली तरी त्या फळाची प्रत सुधारत नाही. अशा वेळी आपण जर झाडाच्या मुळाची काळजी घेतली तर त्यानंतर येणारे पिक हे पूर्वीपेक्षा चांगलेच असते.
अश्याप्रकारे मनुष्याच्या बाबतीत त्याची मुळे म्हणजे तो जो काही करतो आहे तो विचार. ह्याच विचारसरणीवर आपण विचार करणं महत्त्वाचे आहे. आपण करत असलेली पैश्याबद्दलची विचारसरणी आपण आज जिथे आहोत तिथून एकतर खाली किंवा वर घेऊन जाते.
हा जो विचार आहे, तो आपल्या मनामधून येतो आणि दुर्देवाने मनाचे प्रमुख काम आहे संरक्षण. यामुळे आपल्याला आपले मनं संरक्षित करून नेहमी सुरक्षित क्षेत्रामध्ये ठेवायचा प्रयत्न करते आणि इथेच सर्व प्रगतीचे मार्ग थांबतात. आपल्या मनाची ही संरक्षित राहण्याची प्रवृत्ती ही आपल्यावर लहान पनापासून बिंबवली जाते. लहानपानापासून मनावर कोरलेला एक संस्कार, एक सुविचार, एक सर्वश्रुत वाक्य आहे, “पैश्याच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती मोठी”.
मला माहीत नाही का, पण जसं मोठा होत गेलो तसा मी वेगळा विचार करू लागलो. तेव्हा हे वाक्य मला अधुरे वाटायला लागले.
पैश्यांचा विचार, घरदार, समाज, पगार, जगण्यासाठी धावणं, जिंकण, कोलमडणे, परत उभं राहणं.....हे सर्व अनुभवताना, इतरांचे बघताना हे वाक्य माझ्या परीने पूर्ण करायचा प्रयत्न केला, आणि त्या वाक्याला जोड दिली.
“ पैश्याच्या श्रीमंती पेक्षा मनाची श्रीमंती मोठी आहेच पण फक्त मनाचा मोठेपणा पुरेसा नाही, तर जोडीला आर्थिक स्वाथ्य हे हवच”. आणि माझा हे ठाम मत आहे की रिकाम्या पोटी काहीही सुचत नाही. भूक लागल्यावर माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो.
अश्या प्रकारचे अनेक विचार आपल्या मानात ठासून भरलेले असतात जे आपल्या प्रगतीच्या आड येतात. या सर्व नकारात्मक विचारांमुळे आपण चांगल्या सवयींपासून नेहमी दूर राहतो. कारण माणसाची प्रगती ही नेहमी काहीही, “करण्याची सवय अथवा न करण्याची सवय” या वर अवलंबून असते. आपण जर डोळे उघडून नीट पहिले तर आपल्याला आश्चर्य वाटेल की, “असे का असते, की काही लोकांना पैसे खूप सहज मिळतात, तर भरपूर लोकांना पैसे मिळविण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात”. या दोन व्यक्तीमत्वांमध्ये त्यांचे शिक्षण, बुद्धिमत्ता, कौशल्य, वेळ, त्यांच्या ओळखी, त्यांचे बळवंतर नशीब, त्यांचा व्यवसाय, त्यांची गुंतवणूक या गोष्टीमुळे असा हा फरक असावा का?
आश्चर्यकारक उत्तर आहे, असे काहीही नाही. एखादी व्यक्ती त्याच्या जीवनात पैशाने एकदम यशस्वी होते याचे एकमेव कारण म्हणजे, “पैसा व यश यासाठी लागणारी त्याची आर्थिक संकल्पना (Financial Blue print)”. अशी ही आर्थिक संकल्पना प्रत्येक व्यक्तीच्या आंतरीक मनात ठासून भरलेली असते आणि ही आर्थिक संकल्पना प्रत्येक व्यक्तीची वेगळी असते. म्हणून एका व्यक्तीचे यश हे नेहमी दुसऱ्या व्यक्तीपासून पूर्ण वेगळे असते. आणि जर अपल्याला आपल्या आयुष्यात पैश्याच्याबाबतीत  पूर्ण यश हवे असेल तर प्रत्येक व्यक्तीने आपल्या आर्थिक संकल्पनेवर काम करावे अत्यंत महत्वाचे आहे.
आर्थिक संकल्पना ही प्रत्येक व्यक्तिच्या पैश्याबद्दल असणारे विचार, भावना व त्यावर करत असलेली क्रिया यावर अवलंबून असते. ही आर्थिक संकल्पना आपण लहान असल्यापासून आपले शिक्षक, पालक, मित्र परिवार, आपले धार्मिक गुरु, आपली संस्कृती अशा अनेक पैकी काही लोकांनी आपल्या मनावर बिंबवलेल्या गोष्टींवर आवलंबून असते. काही विचार तर इतके बिंबवलेले असतात, की आपण त्यांना सहज सोडू शकत नाही. जसे की,
१.      अंथरूण बघुन पाय पसरावेत.
२.      कष्ट केल्याशिवाय पैसा मिळत नाही.
३.      पैसा मिळवायला पैसेच लागतात.
४.      मला ही गोष्ट परवडत नाही.
५.      पैसे सांभाळणे ही खूप मोठी जबाबदारी आसते.
६.      पैसे ही सर्व वाईट गोष्टींसाठी कारणीभूत आहे.
७.      पैसा माझासाठी एवढा महत्वाचा नाही. म्हणजे माझा आयुष्यात मी पैशाला महत्व देत नाही .
८.      गुंतवणूक करणे ही फक्त पैशावाल्यांची गोष्ट आहे.
९.      भरपूर पैसा कमविण्यासाठी चांगले नशीब लागते.
१०.  दुसऱ्याच्या डोक्यावर पाय देऊनच भरपूर पैसे कमावता येतात......

जरा विचार करून बघा, की आपण ज्या ज्या वेळी असा नकारात्मक विचार करतो त्या त्या वेळी या विश्वामध्ये असणारी एक अनामिक शक्ती आपल्याला म्हणते “तथास्तु”. म्हणजे तसाच आहेस तू. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने, आपण पैशाबद्दल कसा विचार करतो यावर बारकाईने लक्ष द्यावे लागेल व त्यामध्ये बदल करणे अत्यंत आवश्यक आहे. आपण पैशाबद्दल कसा विचार करतो व त्या नकारात्मक गोष्टी कश्या बदलायच्या या साठी खालील नमूद एक छोटा प्रयोग स्वतासाठी करा :-
१.      समजणे:- लहानपणापासून अशी सर्व नकारात्मक वाक्ये जी तुम्ही पैसा व श्रीमंत माणसांबद्दल ऐकली असतील ती लिहून काढा.
२.      जाणून घ्या:-  की या सर्व नकारात्मक वाक्यांमुळे आपल्या आर्थिक यशा मध्ये काय परिणाम झाला आहे.
३.      बाजूला करा :- या सर्व नकारात्मक गोष्टी आपण आपल्या जन्मापासून घेऊन आलेलो  नाही. तेव्हा या सर्व गोष्टी आपण बाहेर फेकून देऊ शकतो.
४.      घोषणा करा:- स्वत:ला ठामपणे सांगा की या सर्व पैशाबद्दल नकारात्मक गोष्टी ज्या मी माझ्या लहानपणापासून ऐकत आलेलो आहे त्या अजिबात बरोबर नाहीत.

मला माझ्या आर्थिक यशासाठी सकारात्मक गोष्टींचा विचार करायला हवा.
तेव्हा, माझ्या सर्व वाचक मित्र व मैत्रिणींनो, या २०१५ च्या नवीन वर्षापासून आपण आपल्या आर्थिक स्वायतता, आर्थिक विकास, आर्थिक यशासाठी आपल्या स्वत:च्या आर्थिक संकल्पने वर लक्ष्य केंद्रित करून ती अधिक सकारात्मक कशी करायची हाच नवीन वर्षाचा ठराव करून वर्षाची सुरुवात करूया.


Happy New Financial Year 2015

1 comment: