Friday 23 December 2016

कर्ज मुक्तीचा – संकल्प



वर्ष २०१६ मधील शेवटचा महिना सुरु आहे. शेवटचे २६ दिवस शिल्लक आहेत. बहुतेक शेतकरी मित्र उस जाण्याची वाट पहात आहे. मराठी माणसाच नविन वर्ष जर पाडव्याच्या दिवसी सुरु होत असल तरी गोऱ्या लोकांच्या सवई प्रमाणे बहुतेक सर्वच जण १ जानेवारी हा दिवस नविन वर्ष म्हणून साजरा करतात. प्रत्येक नविन वर्षी साधारण वर्षाच्या पहिल्या दिवशी, जवळ जवळ प्रत्येक व्यक्ती काहीना काही संकल्प करत असतो.

      संकल्प म्हणजे – स्वतःच्या वाईट सवयी घालवणे अथवा प्रगती करणे यासाठी स्वतः घेतलेली शपथ. जरी स्वतःच्या  प्रगती साठी शपथ घेतली असली तरी असे निदर्शनात आले आहे कि ९०% लोकांचे संकल्प पहिल्या १० दिवसातच मोडतात. असे का होते यावर अभ्यास करून त्यावर काही तोडगा काढण्याच्या ऐवजी बहुतांश जण, "नियम / संकल्प हे मोडण्यासाठीच असतात, अशी मनाची समजुत घालून विषय सोडून देतात.”

      आता नविन वर्षाचा संकल्प करणे हे शहरी लोकांच काम आहे. अशी पद्धत आपण गाव पातळीवरही करू शकतो. याबाबत आपण शेतकरी मंडळी विचार करत नाही. तसं बघायला गेलं तर प्रत्येक माणूस शहरातील असो कि  गावातला, काहीना काही संकल्प करतच असतो. पण तो संकल्प अगदी आयत्या वेळेस केल्याने तो पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपली मानसिकता तयार झालेली नसते.

      चला तर मग. आज हे जाणण्याचा प्रयत्न करूया कि असे का होते. अगदी साध्या शब्दात सांगायचे म्हणजे त्या संकल्पाच्या मागील उद्देश फारच डळमळीत असतो. साधारण पणे आपण खालील प्रकारांमध्ये आपले संकल्प मांडत असतो.

१.      पैश्याच्या बाबतीत.
२.      तुमचे करियर.
३.      तुमची तब्येत.
४.      तुम्हाला काही समाज सेवा करायची आहे.
५.      अध्यात्म.
६.      करमणूक इ.
तुम्ही कोणतेही संकल्प घ्या. साधारणपणे याच साच्या मध्ये मोडतात. हे सर्व संकल्प पूर्ण झाल्यास अंतिम फायदा हा तुम्हालाच होणार असतो. तरी पण तो संकल्प पूर्ण होत नाही. याचे काही खालील नमूद कारणे आहेत.

१.      नेमका उद्दिष्ट माहिती नसते.
या मध्ये तुमचा संकल्प तुम्हाला नेमके काय देणार हे माहिती नसते. उदा:- यंदाच्या वर्षी मला माझी तब्येत चांगली करायची आहे. म्हणजे नेमके काय, हेच माहिती नसल्यामुळे तुम्ही जे अनावश्यक आहे तेच करत राहता. म्हणजे तब्येत चांगली करणे म्हणजे भरपूर खाणे हे समजून अगदी उलट काम केले जाते.

२.      उद्दिष्ट अवास्तव असतात
उदाहरण घ्यायचे झाले तर, यंदाच्या वर्षी मी उच्चांकी उसाचे उत्पादन घेण्याचे ठरवले आहे. असे जर विचार / संकल्प असतील तर नक्कीच प्रॉब्लेम आहे. जर बारकाईने विचार केला तर मागील ४ वर्षात तुमचे सरासरी एकरी उत्पादन ३० तर ४० टनाचे असेल तर अचानक उच्चांकी म्हणजे १०० टनाच्या वर कसे होईल.
      काही काळ निघून जातो व हा संकल्प आवाक्याच्या बाहेर आहे समझुन सोडून दिले जातो. परत ये रे माझ्या मागल्या.

३.      सर्व संकल्प तुमची इच्छां यावर अवलंबून असतात. त्यामागे कोणतीही system किंवा एखादी कार्य पद्धती नसते.
वरील तीन कारणे आहेत ज्यामुळे संकल्प सिद्धीस जात नाही. पण याबरोबर अशी बरीच मंडळी आहेत ज्यांचे संकल्प पूर्ण होतात. तेव्हा तुमचे संकल्प पूर्ण करण्यासाठी काय केले पाहिजे ते पाहूया.
माझे शेतकरी बांधव हे नेहमीच कर्ज – सोसायटी, पिक कर्ज, तारण कर्ज, सावकारी कर्ज अश्या एक व अनेक कर्जाच्या विळख्यात अडकलेले असतात. तर मला असे वाटते कि, “ आपण सर्वांनी मिळून एक संकल्प करूया.” पुढील वर्षी कर्जाच्या कचाट्यातून बाहेत पडायचे. सुरवातीला अवघड वाटेल, पण जसं जसं प्रयत्न सुरु होतील तसं खूपच सोप्पं होईल. तेव्हा मंडळी; कागद आणि पेन घ्या व खालील प्रमाणे गोष्टी मीहून काढा.
१.      कर्ज फेडी बाबतीत तुमचे नेमके काय उद्धिष्ट आहे. तुमचे आत्ताचे कर्ज कितीही असो. पण त्यातून बाहेर पडण्यासाठी सुरवात करावीच लागेल ना. तर उद्धिष्ट ठेऊन काम करूया. या कर्जा पैकी यंदाच्या वर्षी म्हणजे १ जानेवारी २०१७ पासून ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत किती रुपयांचे कर्ज कमी करणार हे लिहून काढा.
२.      कर्ज फेडीचे उद्धिष्ट सोप्प ठेवा:- म्हणजे तुमचे एकूण कर्जापैकी ज्या कर्जासाठी तुम्ही जास्त व्याजदर देता ती कर्ज पहिला निवडा. मित्रांनो जर डोंगराच्या शिखरावर जायचे असेल तर डोंगर चढण्यासाठी पहीले पाऊल तर टाकलेच पाहिजे. तर आज कर्जमुक्तीच्या दिशेने पहीले पाऊल टाका.
३.      जो काही तुम्ही कर्जफेडीचा विडा/ संकल्प उचलला आहे त्यासाठी नुसती इच्छा न ठेवता त्यासाठी लागणारी कार्य पद्धतीने स्वीकारा.

म्हणजे काय तर तुम्हाला कोठून पैसा येणार आहे आणि त्याचे नियोजन कसे करणार यावर भर दया.
आता तुम्ही विचार करत असाल कि नविन वर्ष सुरु होण्यासठी अजून २६ दिवस आहेत. आज कशाचा संकल्प. पण मित्रांनो ज्या दिवशी आपण ठरवू तोच आपला नविन वर्षाचा पहिला दिवस. आज सर्व साखर कारखाने सुरु झालेत. थंडीचे दिवस आहेत. मार्केट मध्ये विविध रंगाची फळे आली आहेत. म्हणजे काय आपण पेरलेला व काळजी घेऊन वाढवलेला शेतमाल बाजारात आहे. म्हणजे शेतकरी मित्राकडे पैसा येत आहे. त्यामुळे मला वाटले कि आजच “कर्जफेडीची व त्यातून मुक्त होण्यासाठीचा” पाहीले पाऊल टाकण्याचा दिवस आहे.

जरा विचार करा, कर्जफेडीचा विचारच केला नाही तर तर कर्ज कधीच कमी होणार नाही. आज विचार केला नाही तर परत आहेच, ये रे माझ्या मागल्या. कर्जातून बाहेर पडावे ही तर मनापासून इच्छा असते प्रत्येकाची. पण त्या दृष्टीने प्रयत्न केला जात नाही. याचं एकमेव कारण म्हणजे, “कर्ज हे शेतकरी बंधूच्या जीवनाचा भाग झाला आहे. कर्जा शिवायही जीवन असत कदाचित तुम्ही विसरला आहात.” जर कर्ज मुक्त झालो तर व्याजापोटी जाणारी रक्कम हा तुमचा थेट नफा आहे. एवढे ध्यानात असु द्या.
      तेव्हा आजच वर्ष पूर्ण व्हायच्या आधीच कर्ज मुक्तीचा संकल्प करूया. त्यासाठी कोणा दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची गरज नाही. जर कर्ज नियोजन व परतफेड योग्य प्रकारे केली तर तुमचे किती पैसे वाचू शकतात हे पुढील लेखामध्ये उदाहरणा सहित बघूया.



3 comments: