Sunday 11 December 2016

यश - पैश्याचे समीकरण


आपण आपल्या आयुष्यात जे काही पाहतो, ऐकतो हे सर्व आपल्या मनाच्या कपाटामध्ये व्यवस्थित साठवून ठेवलेले असते, ही गोष्ट आपण मागील आठवड्यात लेखामध्ये पाहिली. या सर्व साठवलेल्या गोष्टीमुळे प्रत्येकाची एक प्रकारची मानसिकता तयार झालेली असते व त्याच प्रमाणे आपण निर्णय घेतो.

जसं घर बांधण्यासाठी एक आराखड्याची (Building Blueprint) गरज असते; तसेच योग्य तेवढे पैसे कमावण्यासाठी पैश्याबद्दलची मानसिकता योग्य असावी लागते. यालाच मी आर्थिक यशाचा आराखडा म्हणजे Money Blueprint म्हणतो.

चला तर मग, मागील लेखात सांगितल्या प्रमाणे, यावेळी ही Money Blueprint कशी तयार होते. याच्याकडे थोडे बारकाईने पाहूया. त्यापूर्वी मला तुम्हाला यश आणि पैसा याबद्दल एक समीकरण सांगायचे आहे. मला माहिती आहे कि हे समीकरण तुम्हाला नक्की आवडेल.

विचार भावना कृती (Action) = रिझल्ट (Result)




हा एकमेव Formula तुम्हाला अपेक्षित यश व पैसा देऊ शकतो. म्हणजे काय की,
विचार केल्यामुळे – मनातील भावना जागृत होतात.
भावना जागृत झाल्यामुळे Action घेतली जाते, आणि
जर कृती केली (Action घेतली) तरच Result (निकाल) मिळतो.

जर आपण व्यवस्थित पाहीले तर एक गोष्ट लक्षात येईल कि; जी व्यक्ती कामच करत नही ती व्यक्ती विचारच करत नाही. म्हणून जर कोणी चुकीचे वागले तर आपण त्याला म्हणतोच ना, “ जरा विचार कर की लेका”

तुमचे आर्थिक यश हे तुम्ही पैश्याबद्दल कसा विचार करता, पैश्याबद्दलच्या तुमच्या भावना व ते आर्थिक यश मिळवण्यासाठी तुम्ही काय व कशी कृती करता यावर अवलंबून आहे.

थोडे सोपे कारून पाहूया, माझा एखादा लेख जेव्हा प्रसिद्ध होतो तेव्हा साहजिकच खूप लोक वाचत असतील. यामधील काही फोन करतात काही सोडून देतात. तर काही लोक यापेक्षाही पुढे जाऊन मध्ये व्याख्यान ठेवायची तसदी घेतात.

माझे एक वाचक मित्र श्री. माधव चव्हाण, गाव सुस्ते, ता.पंढरपूर यांनी तसदी घेऊन माझे व्याखान आयोजित केले. हे सर्व करण्यामागे त्यांचा एकच विचार होता/ आहे कि प्रत्येक शेतकरी मित्राला आर्थिक गणित समजले पाहिजे. जर आर्थिक गणित समजले तरच शेतकरी सुखाने जगू शकतो हे त्यांना पूर्णपणे माहित आहे.

आता या घटनेकडे आपण बारकाईने पाहीले तर वरील दिलेले समीकरण किती बरोबर आहे हे आपण पाहू शकतो. अनेक लोकांनी लेख वाचला व सोडून दिला. पण श्री. चव्हाण यांनी लेख वाचताना विचार केला. त्यांच्या शेतकरी बांधवांप्रती चांगल्या भावना जागृत झाल्या याच चांगल्या भावनेने त्यांनी मला निमंत्रण देण्याचे कार्य केले. निव्वळ चांगल्या भावनेने न आठेवेठे घेता शेतकऱ्यांच्या भल्यासाठी त्यांनी कार्य केले व मी सुस्ते गावात व्याखानासाठी हजर झालो.

तस पाहीले तर ही खूप छोटीशी घटना आहे. पण याचा व या सारख्या अनेक घटना आहेत ज्याचा तुमचा आर्थिक यशाशी भेट संबंध आहे. मनात तुम्ही हे कसं काय बुवा ! याबद्दल नक्कीच विचार करत असाल. याचं उत्तर असे आहे कि, जर श्री. माधव चव्हाण यांच्या मनात चांगले विचार नसते, तर इतर अनेक लोकांसारखे त्यांनी नुसतं वाचून सोडून दिले असते. पण श्री. चव्हण यांच्या मनावर आपल्या शेतकरी बांधवांसाठी काही तरी चांगले करायची मानसिकता ही तयार होती म्हणून त्यांनी विचार करून कृती केली. याला Money Blueprint (आर्थिक आराखडा) च्या भाषेत Programming म्हणतात. या मुळे आता नवीन समीकरण कसे होईल ते पाहूया.

Programming विचार भावना कृती = रिझल्ट (Result)

programming हे आपण अनुभवलेल्या गोष्टी मुळे होत असते. त्यामुळे “आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार” ही म्हण तंतोतंत बरोबर ठरते.

मुळातच माझ्या बहुतांश शेतकरी मित्रांची पैश्याबद्दलची विचार धारा ही त्यांच्या आर्थिक यशाला मारक असते. उदा. जवळ जवळ ८०% पेक्षा जास्त शेतकरी मित्र हा कर्जाच्या कचाट्यात सापडलेला असतो. आता कोणी म्हणेल कि निसर्गच साथ देत नाही तर जगण्यासाठी कर्ज घ्यावेच लागते. त्यामुळे माझ्या शेतकरी मित्राला कर्जामधून बाहेर पडायचे असते, याचा कधी विचारच येत नाही. त्याच्या मनामध्ये जगण्याची हीच पद्धत आहे हे ठासून भरलेले असते.

जर कर्ज विरहीत जीवन हे तुम्हाला माहितीच नसेल तर त्याबद्दल तुम्ही कधीच विचार करणार नाही. जर हा विचारच केला नाही तर त्या दिशेने तुम्ही कधीच प्रयत्न करणार नाही आणि फक्त त्याचं मुळे तुम्ही कधीच कर्जमुक्त होणार नाही हा मात्र १००% निकाल (Result) होय. जर आपण कर्जमुक्त झालो नाही तर आपला आर्थिक बाजू कधीच सुधारणे शक्य नाही.

त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने त्याच्या मनावर बिंबवलेल्या पैश्याबद्दलच्या विचारांवर काम करणे खूप महत्वाचे आहे. म्हणजेच काय तर डोक्यातील पैश्याबद्दलचे Program / विचार तपासून त्यामध्ये योग्य ते बदल घडवले पाहिजेत.

आता हे आपले मनातील पैश्याबाद्द्लचे विचार काय आहेत आणि बदलायचे कसे, हा विचार तुमच्या मनात येत असेल. पण त्यापूर्वी हे जे काही विचार आपल्या मनावर कोरले गेले आहेत याची सुरवात कुठून झाली यावर थोडा अभ्यास करणे महत्वाचे ठरेल.


तर याच बद्दल आपण पुढच्या लेखामध्ये सविस्तर पाहूया. तो पर्यंत नमस्कर.

No comments:

Post a Comment